आपण जे काही खातो ते
खाल्लेले अन्न पचविण्यासाठी पित्ताचा उपयोग होतो, जेव्हा ते नियंत्रणामध्ये असते, तेव्हा पचनशक्ती उत्तम असते, परंतु जेव्हा ह्याचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ह्याच पित्ताचा त्रास होऊ लागतो, पचनशक्ती कमी होते, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि ते आमाशयामध्ये तसेच पडून राहते. आयुर्वेदामध्ये ह्याचा उल्लेख आम्लपित्त म्हणून करण्यात आला आहे.
वाढलेल्या पित्ताचे लक्षणे:-
मग छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, पोटात दुखणे तसेच भूक न लागणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरु होतात आणि मग सुरु होतो पित्त कमी करण्याच्या गोळ्या घेणे, त्याने तात्पुरता त्रास कमीही होतो, पण ह्या पित्तशामक गोळ्यांचाही शरीरावर दुष्परिणाम होत असतो.
म्हणून पित्त कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते.
पित्त वाढण्याचे कारणे :-
भूक लागल्यावरही न खाणे, कमी किंवा अति मात्रे मध्ये खाणे, जेवणानंतर लगेच झोपणे, रात्री जागरण करणे, भूक मारण्यासाठी किंवा झोप घालवण्यासाठी चहा, कॉफी अतिप्रमाणात घेणे, दारू, सिगारेट, तंबाखू सारखे व्यसन करणे, महत्वाचे म्हणजे सध्या “हाय प्रोटीन डायट”च्या नावाखाली जो रोज मांसाहार किंवा कडधान्य खाल्ले जातात त्यामुळेही पित्ताचा त्रास वाढतो, घाईघाईने जेवण संपविणे, जेवण म्हणुन नुसतेच कच्चे सॅलड खाणे खासकरून रात्री कच्चे सॅलड खाणे, चिडचिड राग संताप करत जेवण करणे, अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीनुसार कारणे वेगवेगळी असू शकतात.
उपाय :-
ह्यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे दर ४ तासांनी खाणे, भूक लागेल तेव्हा नक्की खावे उपाशी राहू नये, प्रमाणात खाणे, आहारामध्ये तुपाचा वापर वाढवणे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशीपोटी तूप घेतल्याने पचनशक्ती वाढते आणि त्यासोबतच खडीसाखर किंवा केळ खाल्ल्याने पित्तही कमी होते.
काय टाळावे:-
कच्च्या भाज्या किंवा सॅलड, तीळ, जवस, कारळ यांसारख्या बिया, ड्राय फ्रुटस, काजू बदाम शेंगदाणे यासारखे नटस, कडधान्य (रोज नको), पालेभाज्या, लसूण, शिळे अन्न, पॅकेट्स मधील अन्नपदार्थ, खारट पदार्थ जसे चिप्स, चीज इत्यादी. वारंवार चहा कॉफी चे अतिसेवन,
मांसाहार, तळलेले पदार्थ,
जागरण, जेवणानंतर लगेच झोपणे, उपाशी राहणे तसेच अतिप्रमाणात खाणे, अवेळी खाणे, रात्री ९ नंतर खाणे, दारू सिगारेट तंबाखू सारखे व्यसन, वेदनाशामक गोळ्या, दही, आंबवून केलेले पदार्थ (ह्याबाबतीत आयुर्वेदानुसार दही आणि आंबवलेले पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत तर मॉडर्न मेडिकल सायन्स नुसार ह्या पदार्थांमध्ये हेल्दी गट बॅक्टरिया म्हणजेच आतड्याना पोषक जीवाणू असल्यामुळे पित्त कमी करते, ह्यामध्ये मतांतर आढळून येते, माझ्या १५ वर्षाच्या प्रॅक्टिसमधील पेशंटच्या डेटानुसार शक्यतो तरुण रुग्णांमध्ये आंबवलेले पदार्थांमुळे पित्ताचा त्रास वाढतो तर ५० वर्षाच्या पुढील व्यक्तीमंध्ये त्रास कमी होतो,असे मला आढळून आले आहे )
चौकट मध्ये :-
पंचामृत – पित्तावरील रामबाण उपाय
दुध, दही, तूप, मध, साखर किंवा केळ ह्यापासून बनविलेले पंचामृत वाढलेले पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे,
महिनाभर रोज सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास 15 दिवस ते 3 आठवड्यांमध्ये पित्त कमी झालेले मला आढळून आले आहे.
पंचामृत सकाळी, दुपारी खा, पण उपाशीपोटी खाल्ल्याने चांगला परिणाम दिसून येतो. पंचामृत प्रमाण – दही २ भाग आणि बाकी सर्व जिन्नस १-१ भाग
डॉ स्वाती खारतोडे
आहारतज्ञ आणि संशोधक
विश्र्वराज हॉस्पिटल पुणे